रायगड असाही पहावा ....

.    रायगड असाही पहावा ....

....असे अगणित क्षण ज्या गडाने पाहिले .. जो या अमुल्य इतिहासाचा भाग आहे .. नाही तो अविभाज्य घटना आहे ... असा हा रायगड ...

                          - बळवंतराव दळवी

     शिवछत्रपती कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्यापुर्वी सोयराबाईंनी शिवछत्रपतींकडे संभाजीराजे आणि राजाराम यांना एकत्र रायगडावर ठेवू नका म्हणून सुचविले होते. सोयराबाईचे हे म्हणणे महाराजांना पटणारे नव्हते पण ... नाईलाजाने त्यांनी ते मान्य केले आणि कर्नाटकात निघण्यापूर्वी महाराजांनी सभा भरविली. महाराज सिंहासनावर बसलेले असताना युवराज संभाजीराजे तिथे गेले. शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या पायावर डोके टेकवले. महाराजांनी त्यांना आपल्या जवळ बसण्याचा आग्रह केला. पण राजनीतीचा अभ्यास केलेले संभाजीराजे त्यांच्या बाजूला बसले नाही. शिवछत्रपतींनी आपल्या ज्येष्ठ मुलाकडे पाहात म्हणाले,
"बाळा, मला हे राज्य कसे मिळाले ते ऐक. माझे बुध्दीमान वडील शहाजीराजे माझी सामुद्रिक लक्षणे पाहून श्रेष्ठ राजनीतीचा विचार असल्यामुळे त्यांनी मला उद्देशून म्हणाले,
"मोठे असले तरी हे राज्य मला पुरेसे नाही. तेव्हा तू अन्य राज्याच्या प्राप्तीसाठी उद्योगाला लागले पाहिजेस. माझी इतरही मुले आहेत. त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने मी मार्ग दाखवीन. तुझा तेजस्वी थोरला भाउ माझ्याजवळ राहून पराक्रम करो. तो आपल्या वागणुकीने स्तुतीस पात्र झाला असून युवराजपद भूषवीत आहे. तू पुण्यदेशाचा ( पुण्याच्या जहागिरीचा ) प्रमुख हो. तुला ब्रह्मदेव उत्तम बुध्दी देइल आणि तू मोठी सत्ता प्राप्त करशील.  .... शंभूबाळ, तुझा सावत्र भाउ तुझ्यापेक्षा लहान आहे. वयात आला ( लग्नाच्या वयाचा ) असल्यामुळे तो मला अतिशय प्रिय आहे. तो या राज्याचा वाटा मिळावा अशी इच्छा करीत नाही. तू तर आपल्या गुणांनी श्रेष्ठ आहेस. सर्व जगावर राज्य करण्यास योग्य आहेस."

अशा कठोरपणाचे असूनही सौम्यपणे बोलणाऱ्या त्या सुर्यतेज पित्याचे सर्व बोलणे अतिशय शुद्धबुध्दीने ऐकल्यावर शंभूराजे महाराजांजवळ विरोध न करता परिणामकारक बोलले ,
"माता पिता गुरुप्रमाणे आपण जे म्हणता त्याप्रमाणे मी वागावे, त्याविरुद्ध वागू नये. आपण आता जे बोललात ते असे पुर्वी आपण कधी बोलला नव्हतात. त्यामुळे बऱ्याच काळानंतर मला मोठ्या आईसाहेबांची ( जिजाऊमातेची ) आठवण झाली. आपल्या अनुपस्थितीत माझे मन स्वराज्यात ( रायगडावर ) रमणार नाही. तुम्ही हे राज्य मिळविले आणि दुसरेही मिळवणार आहात. मला तुम्ही सदैवच हवे आहात. दुसरे काही असो किंवा नसो."

संदर्भ - परमानंदकाव्यम अध्याय ७

किती सुंदर आणि ह्र्दयाला भिडणारा हा पिता पुत्रांमधील संवाद आहे. हा संवाद वाचतानाही डोळे भरून येतात. पिता म्हणून शिवछत्रपतींच्या मनाची घालमेल दिसून येते. आपल्या जाणत्या मुलाला समजवताना त्यांना त्यांच्या वडिलांची ( शहाजीराजांची ) आठवण येते. त्यांचे उदाहरण देउन शिवछत्रपती शंभूराजांची समजूत घालतात. तर आपल्या पित्याचे हे बोल ऐकून शंभूराजांना आपल्या आजीची ( जिजाऊमातेची ) आठवण येते.

रायगडावर गेल्यावर शिवकाळात हरवून जाऊन हा संवाद शिवछत्रपतींच्या राहत्या वाड्याच्या पायरीखाली बसून आठवावा. संभाजीराजे आपल्या छत्रपती पित्याला म्हणालेले शब्द,
"मला तुम्ही सदैव हवे आहात. दुसरे काही असो किंवा नसो..."
हे शब्द आपल्या कानावर पडतील, संभाजीराजांची मनाची घालमेल आपण आठवू शिवछत्रपतींच्या मनातील आपल्या पुत्रासाठीची तळमळ ह्रदयाचे कान देउन आपण ऐकण्याचा प्रयत्न करु आणि आपले डोळे नक्कीच पाणावतील !

या रायगडाने फक्त राजकारणच नव्हे तर शिवछत्रपतींच्या काही कौटुंबिक कडू - गोड आठवणी पाहिल्या आहेत ... त्यांचा हा गड साक्षीदार आहे. असे अगणित क्षण ज्या गडाने पाहिले .. जो या अमुल्य इतिहासाचा भाग आहे .. नाही तो अविभाज्य घटना आहे ... असा रायगड ... राजियांचा गड ...

या नजरेतूनही रायगड पहावा ... याचसाठी यंदा पुन्हा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवतीर्थ रायगडावर जात आहोत .. !

                          संकलन
                   बळवंतराव दळवी

धर्मवीर शंभूराजे whtsp समुहाकरिता लिहिलेला लेख

Comments

Popular posts from this blog

पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

ऐतिहासिक कालगणना अभ्यास

......असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!